- डॉ. सुधीर रा. देवरे
खरा कलावंत कोण? कलावंत आणि समाज
यांचे संबंध काय? कला कोणाला कळते? कलेची किंमत रूपये- पैशांमध्ये करता येते का?
कलेला कामकाळवेगाचे गणित लागू होईल काय? कला आणि नीती यांचा संबंध काय? कोणतेही
शासन कलेची मुस्कटदाबी करू शकते काय? कलाप्रांतातील खटले न्यायालयात सोडविता येतील
का? हे कला जगतातील यक्षप्रश्न सुटणारे नसले तरी अशा प्रश्नांचा ऊहापोह करणारा
प्रातिनिधीक खटला, कलावंताचे बाणेदार उत्तर आणि न्यायालयाचा एक तात्कालीक निकाल वाचायचा
असेल तर द.ग. गोडसे लिखित नांगी असलेले फुलपाखरू हे पुस्तक वाचावे लागेल. १९८९
या वर्षी हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशन, मुंबई यांच्यातर्फे प्रकाशित झाले.
इसवी सन १८७९ मध्ये इंग्लडमध्ये चित्रकार जेम्स मॅकनील व्हिसलर विरूध्द
कलासमीक्षक जॉन रस्किन हा खटला गाजला. रस्किनने सातत्याने जेम्स मॅकनील व्हिसलर यांच्यावर व्यक्तिगत व त्यांच्या चित्रांवर आपल्या भाषणांतून तसेच
वर्तमानपत्रे आणि मासिकांतून लेख लिहून टिका केली. अशाच एका त्यांच्या चित्राच्या कलामुल्यांबद्दलच
संशय घेऊन रस्किनने टिका करताच व्हिसलरने रस्किनवर खटला भरला. आपल्या एका
चित्रावर रस्किनने निघृण, व्यक्तिविषयक टीका केल्यामुळे आपल्या चित्रांच्या
विक्रीवर परिणाम होऊन आपले आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून
रस्किनने आपल्याला एक हजार पौंड द्यावेत, असे व्हिसलरचे न्यायालयात म्हणणे
होते.
चित्रकार जेम्स मॅकनील व्हिसलर
हे चित्रविचीत्र कपडे परिधान करीत. वागण्यातही ते फटकळ, विक्षिप्त आणि अजब गृहस्थ
होते. विंचवाची लांब नांगी असलेले फुलपाखरू हे व्हिसलरने स्वत:चे एक बोधचिन्ह तयार
केले होते.
न्यायालयात खटला उभा राहिल्यावर
व्हिसलरनेच दिलेल्या उत्तरानुसार अटॅर्नी जनरलने त्यांना विचारले की, एक चित्र
काढायला तुम्हाला एकच दिवस लागतो तरीही आपण एका चित्राचे 200 गिनी का मागता?
व्हिसलरने तात्काळ उत्तर दिले,
मी आयुष्यभर मिळविलेल्या अनुभवाच्या हिशोबाने किंमत मागतो. ...कोणत्याही कलाकृतीची
किंमत, काळ-काम-वेगाचे गणित करून ठरत नाही... तर कलावंताने आयुष्यात मिळविलेल्या
अनुभवाचे ते मूल्य असते. या जेम्स मॅकनील व्हिसलरच्या सुभाषितवजा उत्तराने
त्यांनी हा खटला जिंकला आणि रस्किनला नाममात्र दंड झाला.
नांगी असलेले फुलपाखरू याच
नावाच्या दोन दिर्घ लेखात गोडसे यांनी ह्या खटल्यासंदर्भात कला, कलावंत आणि
त्याच्या तपश्चर्येला न्याय दिला आहे. या पुस्तकात एकूण सतरा लेख असून लिहून
भिंतीवर भुजंग भरला रंग चिताय्राकडून, भासाच्या प्रतिमा नाटकातील नियती, बावनखणी,
शतायुषी सौभद्र, राजसंन्यास, असा हा छंद, प्राण्यांचा सुहृद शिल्पी, राघू मैना...
एक कल्पबंध आदी समग्र कलांची मीमांसा मुळातून वाचण्यासारखी आहे.
ह्या लेखसंग्रहात एकत्रित
केलेल्या लेखांमध्ये िचत्रकला, स्थापत्य, शिल्पकला, साहित्य, इतिहास, नाट्यसंगीत
आणि चित्रपट ह्या सातही कलांकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन मिळतो. गोडसे हे फक्त
साहित्य समीक्षक नव्हते, नैसर्गिक कलातत्वांसह सर्व प्रकारच्या कलांची मीमांसा हा
त्यांच्या चिंतनाचा आणि लेखनाचा विषय होता. एका कलेची मीमांसा करतांना ते सहज
दुसय्रा कलांचे साधार उपयोजन करीत असत.
गोडसे यांचे दोन लेखसंग्रह, दोन
नाटके, एक चरित्रात्मक आणि एक भाषणाचे पुस्तक धरून एकूण तेरा पुस्तके प्रकाशित
असून लेखाचा विषय झालेल्या प्रस्तुत पुस्तकासह पोत (१९६३), शक्तिसौष्ठव (१९७२),
गतिमानी (१९७६), लोकधाटी (१९७९), मातावळ (१९८१), ऊर्जायन (१९८५), वाऽक विचार (१९९३),
समन्देतलाश (१९८९) ही त्यांच्या कलामीमांसेची – सौष्ठवविचारांची महत्वाची
पुस्तके म्हणता येतील.
द. ग.
म्हणजे दत्तात्रय गणेश गोडसे. सुरूवातीच्या काळात पुस्तकांचे मुखपृष्ठकार म्हणून
गोडसे प्रसिध्दीस आले. बडोद्याच्या फाइन आर्ट महाविद्यालयात ते कला शिक्षक होते.
मात्र उत्तरायुष्यात त्यांनी सौंदर्यमीमांसेत प्रंचड मोठे योगदान देऊनही त्यांच्या
कलामीमांसेवर टिका करताना समीक्षकांकडून त्यांचा उल्लेख चित्रकार गोडसे असाच होत
असे. असा उल्लेख वाचून ते व्यथित होत पण नर्म विनोदाने खाजगीत म्हणायचे, एकदा
चित्रकार म्हणून कुंकू लागला की तो पुसता पुसला जात नाही. आणि यात दुसरी मेख अशी
आहे की, गोडसे हे चित्रकार असल्यामुळे त्यांनी आमच्या समीक्षेच्या प्रांतात नाक
खुपसू नये असेही इतर समीक्षक मला आडपडद्याने बजावत असावेत.
गोडसे यांच्या कलामीमांसेला अनेक
ज्ञानशाखांची डूब प्राप्त झाली आहे. सौंदर्यशास्त्र, साहित्यशास्र्त्र स्थापत्यशास्त्र,
इतिहास, तत्वज्ञान, धर्मशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, सामाजिकशास्त्रे,
जीवशास्त्र, प्राणिशास्त्र, गणित- भूमिती, शरीरशास्त्र, खगोलशास्त्र, भूस्तरशास्त्र,
अतिभौतिकी, पदार्थविज्ञान इत्यादी विज्ञाने अशा विविध ज्ञानशाखांची संदर्भ-
संपृक्तता हे गोडसे यांच्या कलामीमांसेचे वेगळेपण आहे. मराठी समीक्षेतील हे
वेगळेपण विशेषत्वाने नजरेत भरणारे आहे. त्यांची समीक्षा पंडिती वळणाच्या
प्राध्यापकी समीक्षेसारखी नसून सर्जनशील विवेकाची आहे. ती आस्वादक समीक्षेसारखी
रसग्रहणावर समाधान मानणारी नाही. परंतु असे असूनही ही मीमांसा काहिशी दुर्लक्षित
राहिली. गोडश्यांच्या कलामीमांसेने मराठी सौंदर्यशास्त्रात व समीक्षेत
वैशिष्ट्यपूर्ण भर घातली आहे.
आपल्या अवतीभवतीच्या लोकजीवनातून
आविष्कृत झालेल्या लोकाविष्कारांचा साक्षेपी वेध घेणारा समीक्षक म्हणून द. ग.
गोडसे यांच्या कला मीमांसेने कलाप्रांताचे लक्ष वेधून घेतले. इतर मराठी
समीक्षकांपेक्षा गोडसे यांच्या रसास्वादी आणि तरीही अभ्यासिन समीक्षेच्या (Practical Criticism) वेगळेपणाचे मर्म शोधण्याच्या जिज्ञासेतून ही मीमांसा
अभ्यासली पाहिजे.
गोडश्यांनी
आपल्या संकल्पनांचे व प्रमेयांचे अनेक कलाकृतींच्या संदर्भात उपयोजन केले आहे. या
उपयोजनात चित्र, शिल्प, साहित्य, नाट्य, नेपथ्य, संगीत, नृत्य, वास्तु आणि
नैसर्गिक आविष्कारही येतात. त्यामुळे या अभ्यास विषयाची व्याप्ती अभ्यासिन (Practical) किंवा उपयोजित ( Applied ) समीक्षेतून त्यांनी सांगितलेल्या विविध कलातत्वांचा पडताळा घेता येतो.
पंथ,
संप्रदाय, धर्म यांचाही कलाविष्काराशी घनिष्ट संबंध येत असतो. जगातील आद्य वाङमय कुठल्यातरी
मताच्या म्हणजेच संस्कृतीच्या प्रचारार्थ लिहिले गेले आहे. आज जागतिक महाकाव्य
म्हणून मान्यता पावलेले रामायण, महाभारत, इलियड हे ग्रंथसुध्दा विशिष्ट संकृतीचे
ग्रंथ आहेत, जे नंतर जागतिक मान्यता पावलेत. त्यांची मीमांसा करणे आणि ती पचवणेही
आपण हळहळू शिकले पाहिजे.
(रविवार
दिनांक 1 एप्रिल 2012 च्या महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणीत, प्रकाशित झालेला
लेख)
-डॉ सुधीर रा. देवरे
इमेल : sudhirdeore29@rediffmail.com