शनिवार, १६ मार्च, २०१३

सख्खा शेजारी: पक्का वैरी



 
- डॉ. सुधीर रा. देवरे

         भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या- विशेषत: पाकिस्तानच्या बाबतीत केलेल्या धरसोडीच्या धोरणाने आपल्याला वेळोवेळी अपमानित होण्याची वेळ येतेय. अफजल गुरूला झालेली फाशी म्हणजे भारतातील एक बिघडलेल्या दहशतवाद्याने जगातील सर्वातमोठ्या आणि आपल्याच देशातील सर्वोच्च लोकशाहीच्या व्यासपिठावर केलेल्या हल्ल्याची शिक्षा होती. मात्र हे आपल्या कृतीतून वेळेवर जगासमोर न मांडल्यामुळे पाकिस्तानसारखे दहशतवादी देश आपली खोडी काढू पाहतात.
         आजपर्यंत पाकिस्तान सांगत होतं, की दहशवादाशी आमचा कोणताही संबंध नाही. आम्हीच दहशतवादाची शिकार आहोत. पण दिनांक 14-3-2013 या दिवशी त्यांच्या संसदेत त्यांनी अफजल गुरूच्या फाशीबद्दल भारताचा निषेध करण्याचा जो ठराव केला त्या ठरावाने त्यांनी हे जगाला दाखवून दिले, की पाकिस्तान हा अधिकृतपणे जा‍गतिक दहशतवादाचा पुरस्कार करतोय. पाकिस्तानच्या या कृतीमुळे ते किती बालीश आणि असंमजस व धर्मांध राष्ट्र आहे हे पुन्हा एकदा सिध्द झालंय.
         पाकिस्तानला आज कोणती उपमा द्यावी हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. कारण कोणतीही उपमा फिकी पडेल असे पाकिस्तानचे हे कृत्य आहे. आज पाकिस्तानला उपमा द्यायचीच झाली तर रॅबीज झालेल्या श्वानाची देता येईल. पाळलेल्या श्वानाला रॅबीज झाला तर त्याला कितीही जीव लावा, त्याचे लाड करा वा त्याला कुरवाळा, प्रेम करणार्‍यालाच तो चावा घेतो. भारताने जेव्हा जेव्हा पाकिस्तानला प्रेमाने कुरवाळायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्याने भारताला कडकडून चावा घेतला. अशा श्वानाला डॉक्टर इंजेक्शन देऊन शांत करतात. म्हणजे मारून टाकतात. कारण तो श्वान कधीही बरा होणारा नसतो.
         पाकिस्तानला मारण्याचे पाप भारताने कधीही करू नये. तरीही त्याला कुरवाळण्याचे उद्योगही त्वरीत बंद केले पाहिजेत. त्याच्याशी असलेला व्यापार बंद केला पाहिजे. कोणत्याच प्रकारची चर्चा करता कामा नये. बस, ट्रेन बंद केल्या पाहिजेत. कोणालाही भारतात यायला व्हिसा देणे बंद केले पाहिजे. खेळ बंद केले पाहिजेत आणि सिमेवर जास्त पहारा देऊन त्याच्या कोणत्याही आगळिकीला जिथल्यातिथे चोख उत्तर देणे सुरू ठेवले पाहिजे.
         पाकिस्तान हा इस्लामचे नाव घेऊन इस्लामच्या शिकवणुकीला काळे फासणारा देश आहे. भारतातील ज्यांना कोणाला पाकिस्तानबद्दल प्रेम असेल (ओवेसी, अफजल गुरू सारखे) त्यांनाही कडक इशारा द्यायला हवा: पाकिस्तान आता जास्त काळ एक देश म्हणून अस्तित्वात राहणार नाही आणि राहिला तरी तो देश म्हणण्याइतका कधीच भरभराटी करू शकणार नाही. म्हणून पाकिस्तानच्या भरोश्यावर असणार्‍यांनो, तुमचेही भवितव्य अंधारात आहे. म्हणून सावधान.

-         डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा